आम्ही बदलली १३ घरे (भाग - १२)
"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - १)
फ्लॅशबॅक
मी कुठेतरी ऐकलं होत, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द (हट्ट) आणि जिज्ञासू असण फार गरजेचं असतं. मी तसा लहानपणापासून हट्टी तर होतो पण भारी चौकसही! माझ्या बालबुद्धीला ज्या गोष्टी सहजासहजी समजत नसत, नेमकं त्याच गोष्टींचं मला कुतूहल वाटायचं.
आता एखादी गोष्ट समजून घ्यायची म्हटलं, ती हाताळण आलंच! आणि त्या वस्तू हाताळताना छोटे-मोठे घोळ तर होणारच ना! जर माझे आई-वडील आजकालच्या 'जेन्टल पॅरेंटिंग' (Gentle Parenting) वाले असते, तर त्यांनी मला नक्कीच 'चौकस गणऱ्या' म्हटलं असतं. पण कसलं काय? आमच्या घरच्यांनी आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांनी मिळून मला 'खट्याळ गणऱ्या' ही पदवी बहाल केली आणि पुढे याच नावानं माझा 'उद्धार' होऊ लागला!
सुगीचे दिवस होते. थंडीचे दिवस असले, तरी दुपारचा सूर्य चांगलाच तळपत होता. शेतात या वेळी हरभरा टरारून आला होता. आई, नाना, काका, काकू, आजी आणि भाऊ (माझे आजोबा) सगळेच सकाळपासून हरभरा काढण्याच्या कामात मग्न होते. शेतात जागोजागी हरभऱ्याच्या झाडांचे ढीग दिसत होते. मी आणि दिनू आम्हाला जमेल तशी त्यांना मदत करत होतो.
हरभऱ्याची छोटी-छोटी, कोवळी झाडे आम्ही उपटत होतो आणि आजीने दिलेल्या पंच्यात जमा करत होतो. आजीला म्हणे हीच कोवळी झाडे वाळवून वर्षभरासाठी भाजीची सोय करायची होती. आम्ही करत असलेली ही मदत पाहून आणि माझ्या, दिनूच्या वायफळ, बालिश गप्पा ऐकून सगळ्यांच चांगलच मनोरंजन चाललं होत. तर आजी आणि भाऊ आमच्या कष्टाचं कौतुक करून आम्हाला खरोखरच 'हरभऱ्याच्या झाडावर चढवत' होते!
दुपार झाली तशी जेवायची वेळ झाली. सर्वजण हातातली कामे सोडून, आमच्या शेतातल्या त्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली जमले. आई आणि काकूने शिदोरी सोडली आणि सगळ्यांना वाढायला घेतले. सकाळपासून हरभऱ्याचे कोवळे घाटे खाल्ल्यामुळे मला आणि दिनूला तशी भूक नव्हतीच. त्यामुळे आम्ही मोठ्यांच्या आजूबाजूलाच खेळत होतो.
चिंचेच्या झाडापासून जेमतेम २०-२५ फुटांवरच आमची विहीर होती. खेळता-खेळता आम्ही नकळत विहिरीजवळ गेलो. ते पाहून आई लगेच ओरडली, "ए पोरांनो, तिकडे नका जाऊ! परत या इकडे." आईचा ओरडा ऐकून आम्ही जिथे होतो, तिथेच थांबलो. पण, जेवण करता-करता सगळेजण गप्पांमध्ये मग्न झाले आहेत, हे पाहताच आम्ही पुन्हा हळूच विहिरीजवळ सटकलो.
इतक्यात दिनू पळत पळत माघारी आला. तो खूप घाबरला होता. तो मोठ्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, पण भीतीमुळे त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता... तो फक्त "कण्या... कण्या..." (गण्या... गण्या...) एवढेच बोलत होता. आणि तेवढ्यात विहिरीतून 'धुडूम...' असा मोठा आवाज झाला! तो आवाज खरंच काळजाचा ठोका चुकवणारा होता. सगळेच दचकले.
आईने जेवता-जेवता लांब मान करून विहिरीच्या दिशेने पाहिले, पण तिला काठावर मी दिसलो नाही. आईच्या काळजात धस्स झालं, ती जोरात ओरडली, "गण्याssss...!" काठावर मी दिसत नसल्यामुळे, 'गण्या विहिरीतच पडला', या विचाराने आजी आणि सगळेच जीवाच्या आकांताने विहिरीच्या दिशेने धावत सुटले.
विहिरीजवळ येताच, मी त्यांना सुखरूप दिसलो आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. मी काय उद्योग केला होता? तर, 'पोहरा' म्हणून वापरली जाणारी ती मोठी बादली मी विहिरीत टाकली होती. त्याच बदलीचा तो आवाज होता. त्या बादलीला बांधलेल्या दोरीचे दुसरे टोक माझ्या हातात होते आणि मी ती बादली वर ओढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो.
पण मी माझा सगळा जोर लावून सुद्धा ती जड बादली काही केल्या वर येत नव्हती. चार वर्षाच्या इवल्याशा हातांना हे ओझ थोडीच झेपणार होत. छोट्याशा माझ्या हट्टी मेंदुला हे समजूनच घ्यायचं नव्हतं, मला नानांसारख विहिरीतून पाणी शेंदायचं होत. मला वाटलं, जेवण झाल्यावर सगळ्यांना प्यायला आणि हात धुवायला पाणी तयार ठेवावं.
पण माझ्या या उद्योगानं, मोठ्यांना हात धुवायला पाणी मिळण्याआधीच, आता माझीच 'धुलाई' होण्याची वेळ आली होती!
आजचा दिवस
आम्ही पुण्याला येऊन मोजून दोन तीन दिवस झाले होते. थेरगाव गावठाण येथे एका चाळीत, आमच पहिलं वाहिल भाड्याचं घर होत. अजून शेजारची एक दोन घर सोडली तर आम्हाला कोणीच ओळखत नव्हतं.
पण आज चाळीत नुसती धावपळ उडाली होती. सगळेजण चाळीच्या आजूबाजूला जीवाच्या आकांताने शोधाशोध करत होतो. चाळीतल्या पुरुषांनी शेजारची सिंटेक्सची ती मोठी टाकी, जवळच वाहणारी पवना नदी, अगदी पलीकडची स्मशानभूमी... सगळं काही पालथं घातलं होतं.
इकडे आमच्या पडवीत, बायकांच्या घोळक्यात आईचा हंबरडा फोडून आक्रोश चालू होता. तिची ती अवस्था बघवत नव्हती. पप्याची आई तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला धीर देत होती. पप्या म्हणजे या गावात आल्यावर झालेला माझा पहिला मित्र!
काकूंच्याही (पप्याची आई) डोळ्यांत पाणी तरळत होतं. त्यांच्या पदराला धरून पप्याच्या दोन लहानग्या बहिणी उभ्या होत्या. त्यांना नेमकं काय झालंय हे कळत नव्हतं, पण वातावरण बघून त्याही रडवेल्या झाल्या होत्या.
घोळक्यातल्या बायका तोंडावर पदर दाबून, पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकींशी कुजबुजत होत्या, "बिचारे.. आत्ताच तर राहायला आले होते ना.. असं व्हायला नको होतं.." "पण बाई कोण आहे ही?" "नक्की काय झालंय?" कोणालाच अजून नीटसा उलगडा होत नव्हता...
क्रमशः





तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा
ReplyDelete