"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - ३)

आम्ही बदलली १३ घरे - पुना (भाग १४)

आम्ही बदलली १३ घरे (भाग - १४)

"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - ३)

(फ्लॅशबॅक - गावाकडचा दिवस)

गावाकडे असताना संपूर्ण गावात मोजून दोन-तीन घरी टीव्ही असायचा आणि तेही सगळे 'ब्लॅक अँड व्हाईट'. सगळीकडे फक्त दूरदर्शन! तसंही दिवसभर टीव्ही बंदच असायचा, कारण घरातली मोठी माणसं शेतावर कामाला गेलेली असायची आणि दिवसा टीव्हीवर कार्यक्रमही नसायचे. पण संध्याकाळी ६:३० वाजता "आमची माती, आमची माणसं" लागायचं. आजही नुसतं नाव घेतलं तरी, त्या कार्यक्रमाचं 'टायटल साँग' कानात वाजू लागतं. त्यानंतर ७:०० वाजता मराठी बातम्या, मग दीड तास मराठी कार्यक्रम, ८:३० ला हिंदी बातम्या आणि नंतर हिंदी कार्यक्रम असा सगळा नित्यक्रम असे.

माझं तर रोजचंच ठरलेलं होतं. संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून कोणाच्या तरी घरी जाऊन, ओसरीवर जिथे जागा मिळेल तिथे बसून टीव्ही बघायचा. अगदी 'आमची माती आमची माणसं' मधलं काही 'माती' (काहीच) कळलं नाही तरी चालेल, पण मी ते बघायचोच. मला टीव्ही बघायला जाम आवडायचं.

मला आठवतंय, एकदा माझ्या डाव्या डोळ्याच्या जरासं वर खोच पडली होती आणि तीन टाकेही पडले होते. आष्टीवरून डॉक्टरांकडून यायला उशीर झाला. घरातले सगळे त्या धक्क्यातून अजून नीटसे सावरलेही नव्हते. आमची आजी 'नशीब डोळा वाचला' म्हणून देवाचे आभार मानत जप करत बसली होती.

पण इकडे घरी पोहोचल्या-पोहोचल्या मला मात्र काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. माझ्या 'टीव्ही पाहण्याच्या तपस्येत' व्यत्यय आला होता! रोजच्या वेळेत मला टीव्ही पहायला जाता आलं नव्हतं आणि माझ्या या 'टीव्ही-साधनेत' असा खंड पडलेला मला अजिबात सहन होत नव्हता. हे लक्षात येताच मी टीव्ही पहायला जाण्याचा हट्ट धरला. माझ्या या हट्टामुळे, आमच्या आप्पा काकांना माझी दया आली की मीच त्यांना जबरदस्तीने यायला भाग पाडले, कुणास ठाऊक!

पण ते तयार झाले. बाहेर गडद अंधार पडला होता. काका एका हातात बॅटरी आणि दुसऱ्या हाताने मला कडेवर घेऊन घरातून निघाले. गावात लोक लवकर झोपत असल्यामुळे एक-दोन घरी फिरावं लागलं. पण अखेर एका घरी विनवण्या करून आम्ही टीव्ही चालू करवलाच. हिंदीतलं काही कळत नसतानाही, मी त्या बातम्या पाहिल्या आणि तेव्हा कुठे माझा जीव शांत झाला!

Child watching old TV

(फ्लॅशबॅक - आजचा दिवस सकाळ)

पप्या उठला आणि सटासट तयार झाला. त्याचा तयार होण्याचा वेग बघण्यासारखा होता. मी घरातून एक पिशवी घेतली, ती हातात गुंडाळून, चप्पल घालता-घालताच आईला म्हणालो, "आई... येतो ग!"

"सावकाश जा! आणि लवकर परत ये!" आई म्हणाली. मी या परस्परविरोधी वाक्यांचा विचार करतच होतो, तेवढ्यात आईकडून पुढची सूचना आली, "पप्याच्या बरोबरच राहा, त्याला सोडून कुठे जाऊ नको." आता मात्र मला वाटलं, हे जरा जास्तच होतंय आईचं! मी निमूटपणे "हो" म्हणालो आणि पळतच बाहेर आलो. पप्या निघायला तयारच होता.

आम्ही आमच्या पडवीतून बाहेर पडलो तशी पप्याची बडबड सुरू झाली. जाता-जाता त्याने लांबूनच मला माझी होणारी नवीन शाळा दाखवली. ती इमारत खरंच खूप मोठी होती. कुठे गावाकडची आमची ४-५ खोल्यांची शाळा आणि कुठे इथली ही तीन मजली, २०-२५ खोल्यांची भव्य शाळा! इमारतीचा तो शुभ्र रंग पाहून, बहुदा उन्हाळ्याच्या सुट्टीतच नुकतीच रंगरंगोटी केली असावी, असं वाटत होतं. शाळेसमोरच मोठच्या मोठं मैदान दिसत होतं. ते पाहून 'शाळा कधी सुरू होतेय' असं वाटलं. मला शाळेच्या इमारतीला भेट देण्याचा मोह झाला, पण मी त्याला आवर घातला.

Big school building

रस्त्यात त्याने मला अगरबत्तीच्या खोक्यांच्या पुंगळ्या बनवण्याचा एक कारखाना बाहेरूनच दाखवला. एका पत्र्याच्या पडवीत काही बायका लाटण्यासारखं काहीतरी घेऊन, एका पुठ्ठ्यावर डिंक लावून आणि त्यावर कागद चिटकवून ते लाटत होत्या आणि तयार झालेली पुंगळी काढून, वाळविण्यासाठी टाकत होत्या. तिथे अशा पुंगळ्यांचा ढीग लागला होता. त्याने पाळलेली कबुतरं, त्यांची खुराडी मला दाखवली आणि ते 'गुटूर-गु' करणारे कबुतरे पाहून मला नवलच वाटलं. लोक कबुतरं पण पाळतात, हे मला माहितीच नव्हतं.

Women working in agarbatti factory

असंच गावदर्शन करत करत आम्ही पाराजवळच्या वाण्याच्या दुकानात पोहोचलो. त्याच्याकडून आईने सांगितलेलं सगळं सामान घेतलं आणि परतीच्या वाटेला लागलो. पप्याला मला गाव दाखवण्याचा भारी उत्साह होता. तो म्हणाला, "गणेश, आपण आता दुसऱ्या रस्त्याने जाऊयात."

मला तो 'गणेश' म्हणाला हे ऐकून मी जरा ओशाळलोच. कारण, कालच ओळख झालेल्या या मुलाला मी अगदी हक्काने त्याच्या घरच्या नावाने म्हणजेच 'पप्या' म्हणत होतो आणि हा मात्र मला 'गणेश' म्हणत होता! त्याच्या तोंडून 'गणेश' ऐकून मला परकं वाटलं. मी त्याला जवळचा 'दोस्त' मानून 'पप्या' म्हणत होतो आणि हा मात्र माझं असं नाव घेऊन अंतर ठेवून वागत होता. बहुतेक, मला 'जिवलग मित्र' करून घ्यायला हा माझ्याइतका उतावळा नसावा.

मी असा विचारात हरवलेला दिसल्याने त्याने पुन्हा विचारलं, "जायचं का? तेवढाच वेळ लागेल घरी पोहोचायला आणि नदी पण दिसेल.." मी 'हो' म्हणून मान डोलवली. आज मी फक्त "हो", "नाही", म्हणून फक्त मानाचं डोलवत होतो, मी काहीच बोलत नव्हतो; तसा मुळात मी बडबड्या, पण आज पप्याचा दिवस होता.. तोच फक्त बोलत होता!


(आजचा दिवस - आत्ता)

माझ्या मनात नाना आणि त्यांच्या कंपनीबद्दल नको नको ते विचार यायला लागले. कंपनीत काही झालं असेल का? की बसने जाताना काही अघटित घडलं असेल? आम्ही परतीच्या वाटेवर असतानाच रस्त्यावरून एक कंपनीची बस जोरात हॉर्न वाजवत गेली. त्या बसकडे बघून मला एकदम नानांची आठवणही झाली होती. या विचारांनी मला आईला सामोरं जाण्याचं धाडस होत नव्हतं.

मगाचा उत्साह कुठल्या कुठे पळून गेला आणि माझा जीव रडकुंडीला आला. तेवढ्यात मघाशी गायब झालेला पप्या अचानक प्रगटला. त्याचा चेहरा उतरलेला होता. त्याने माझ्या कानात दबक्या आवाजात जे काही सांगितलं, त्यामुळे माझे हातपाय थरथर कापायला लागले. डोकं सुन्न झालं. आता आईला आणि या अनोळखी लोकांना कसं सामोरं जायचं, हेच मला कळत नव्हतं.

क्रमशः

- प्रस्मित
Share:

3 comments:

  1. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही इथे लिहू शकता...

    ReplyDelete
  2. खुपचं छान जमलाय हा भाग!!

    ReplyDelete
  3. खुपचछान आवडले खरंच छान जमलाय भाग 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

    ReplyDelete

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या

Powered by Blogger.

Contact form

Name

Email *

Message *

Most Popular

Popular Posts